क्रांतिकारी समाजसुधारक : वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ / Sant Wamanbhau



१९ व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात दोन महान विभूति मानवी रूपात अवतरल्या. एक म्हणजे साक्षात वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ आणि दुसरे होते, शांतीब्रम्ह संत भगवानबाबा. योगायोग म्हणजे हे दोन्ही हरिचे दास जन्मले ते कूळ होते वंजारी. ज्या समाजाला ना इतिहास ना भूगोल कोठून आला, कोठे चालला माहित नाही. कायम भटका, डोंगर-दऱ्याखोऱ्यांमध्ये वास्तव्य.. त्यामुळे अनेक अंधश्रध्दा,अनिष्ट रूढी, परंपरांनी पिंजून गेलेला मराठवाड्यातील हा भाग या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला.

संत वामनभाऊंचा जन्म बीड जिल्ह्यातील फुलसांगवी या गावी १ जानेवारी १८९१ ला माता राहिबाई व पिता तोलाजी सोनवणे या वारकरी दांपत्याच्या पोटी झाला. जन्माबरोबरच आईच्या मायेला मुकलेलं हे बाळ आजीच्या सहवासात वाढू लागलं. सवंगडयांबरोबर भजनकिर्तन व दिंड्यांचा खेळ खेळू लागलं. जन्मतःच भाऊंचा पिंड हा वारकरी होता, याचा हा प्रत्यय.  प्राथमिक शिक्षणाची पायरी चढली अन् त्यानंतर मार्ग सापडला तो थेट ज्ञानीयांचा राजा असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीचा. अध्यात्मिक शिक्षणासाठी भाऊ आळंदीत दाखल झाले. येथेच भाऊ व भगवानबाबांची पहिली भेट झाली. एक तपाचे शिक्षण पूर्ण करून भाऊंनी आपल्या अध्यात्मिक कार्यासाठी निवड केली ती गहिनीनाथ महाराजांचे संजीवन समाधीस्थान असलेले श्रीक्षेत्र कणकगिरी (चिंचोली ता. पाटोदा, जिल्हा बीड) क्षेत्राची. हे वारकरी संप्रदायाचे मुळ पिठ असल्यामुळेच भाऊंनी हे ठिकाण निवडले असावे.

देशात एकीकडे इंग्रजी राजवट तर मराठवाड्यात जुलमी रझाकारांची दडपशाही असा भीषण संकटाचा तो काळ होता. बालाघाटाच्या डोंगर रांगांमध्ये नाथ संप्रदायाचे वास्तव्य राहिले आहे. चिंचोली येथे नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. हा परिसर अत्यंत दूर्गम, डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा होता. नाथांची त्यांच्या पुजाऱ्यांना दान मिळालेली बारा बिगा जमीन याठिकाणी होती. परंतु त्यावर रझाकारांची हुकूमत होती. भाऊंनी त्या विरोधात आष्टी कोर्टात काही काळ न्यायालयीन लढा दिल्याची नोंद आहे. या लढाईत गहिनीनाथांची समाधी सर्व समाजासाठी मुक्त करण्याची पहिली कामगिरी भाऊंनी केली. ही समाधी सद्याच्या गहिनीनाथ गडापासून अंदाजे १ कि.मी. वर आहे.

गहिनीनाथांना गुरूस्थानी मानून भाऊंनी चिंचोली येथे भव्य दगडी गडाची उभारणी केली. येथे विठ्ठल- रुख्मिणी मुर्ती व नाथांचे समाधी मंदिर बांधून वारकऱ्यांसाठी हक्काचे धर्मपीठ निर्माण केले. येथूनच गहिनीनाथगड ते पंढरपूर आषाढी, कार्तिकी वारीला दिंडी तसेच आळंदी दिंडी सुरू केली. दिंडीची ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. त्याचबरोबर नारळी सप्ताहाचा प्रारंभ केला. आज जवळपास पाऊणशे वर्ष झाली, गावोगाव बदलत्या क्रमाने नारळी सप्ताह अविरत सुरू आहेत. या गडाला आज 'ब' तीर्थक्षेत्राचा दर्जा लाभला आहे. संत वामनभाऊ हे नाव उच्चारल्याबरोबर लाखो भक्तांना एक रोमांचकारी प्रेरणा मिळते. बलदंड शरीरयष्टी, पहाडी आवाज, पांढरा शुभ्र पेहराव, कपाळी अष्टगंध, गळयात तुळशीची माळ आणि मुखी रामकृष्णहरी हा अमोघ मंत्र असे भाऊंचे सर्वव्यापी व्यक्तिमत्व होते. हे महाराष्ट्रातील एक प्रसिध्द मराठी संत आणि किर्तनकार होते. संत वामनभाऊ हे एक अवतारी सिध्दपुरूष व साक्षात्कारी संत होते . त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली.

मराठवाड्यातील हा भाग स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच वेगळ्या ठेवणीचा आणि वळणाचा म्हणून ओळखला जातो. त्यातच बीड जिल्हा म्हणजे आदिवासीच. मात्र त्यांनी अडाणी समाजाला अक्षरशः वठणीवर आणले. त्यांचा दृष्टिकोन समाजसुधारकाचा होता. त्यामुळे नर-नारी समान जात-पात, धर्म, पंथ असा कोणताही भेदभाव त्यांनी केला नाही. वंजारी समाजाबरोबरच इतर अठरापगड जाती धर्मामध्ये त्यांचा मोठा भक्त परीवार आहे. बालब्रम्हचारी असलेल्या भाऊंनी शुद्ध शाकाहार, एकादशी व्रत, अहिंसा आदी तत्त्वांचा पुरस्कार करून वारकरी सांप्रदायाचा महिमा आपल्या कीर्तनातून सांगितला. त्यांची शिकवण ज्यांनी तंतोतंत आचरणात आणली असे हभ.प. नारायण महाराज व ह.भ.प.खंडोजी बाबा संतपदाला पोहोचले. प्रत्येकाने या तत्वांचा अंगीकार करावा व जीवनाचं सार्थक करावे, असा त्यांचा उपदेश असे. अनेक वेळा गावो-गावी होणाऱ्या किर्तनाला तसेच दिंड्यांमध्ये सहभागी होण्यासाठी ते सर्वसामान्यांना स्वतः आवाहन करत. परंतु काही जण सुरूवातीस त्यांचं म्हणण मानत नसत. काहीतरी कारणं सांगून टाळण्याचा प्रयत्न करत. अशावेळी तू म्हणशील तसेच होवो, असे भाऊ म्हणाले की, त्या भक्तांना भाऊंच्या बोलण्याचा प्रत्यय येई. भाऊंना वाचासिध्दी प्राप्त होती. ते बोलत तसेच घडत असे. हे वास्तव असून आजही हयात असलेले असंख्य भक्त भाऊंच्या वाचासिध्दीचा अनुभव कथन करतात. त्यामुळे भाऊंना भक्तगण थरकून असत, किंबहुना त्यांचा भक्तांवर जबरदस्त प्रभाव आहे. त्यामागे त्यांचा कोणताही स्वार्थ नसे तर संसाररूपी मोहमायेत गुरफटलेल्या जिवाला शिवाशी एकरुप करणे, समाजाला अध्यात्माच्या, विकासाच्या प्रवाहात आणण्याचा खरा उद्देश असे. भाऊंचा स्वभाव तापट होता परंतु, हृदयात मायेचा अथांग सागरही होता. कारण त्यांना असत्य आजिबात पटत नसे. एखाद्यावर रागावले तरी दुसऱ्याच क्षणी त्याची आस्थेनं विचारपूस करत. ब्रमहचर्य व्रत जोपासतांना स्त्रीला त्यांनी मातेसमान मानले. स्रियांना ते अंतरावरूनच दर्शन देत. कारण समाजातील अपप्रवृत्तींनी स्त्रियांच्या माध्यमातून अनेक संत, महंत आणि योग्यांवर बालंट आणल्याचा इतिहास ते चांगलेच जाणून होते.

भाऊ व बाबांचे अध्यात्मिक शिक्षण आळंदीत झाले. दोघांचेही गुरू एकच असल्यामुळे ते गुरुबंधू म्हणून परिचित झाले. वामनभाऊ बाबांपेक्षा ५ वर्षांनी मोठे होते. त्यामुळे बाबांनीच त्यांना भाऊ ही उपाधी दिली. सलग १२ वर्ष दोघे एकत्र राहिले शिकले आणि अध्यात्मिक कार्यातही एकमेकांना शेवटपर्यंत साथ दिली. दोघांचे कार्य करण्याचे ठिकाण भलेही वेगळे असले तरी मार्ग हा एकच होता. तो म्हणजे भागवत धर्माचा प्रचार व प्रसार आणि समस्त मानव जातीचे कल्याण. विचारांचा हा समान धागा असल्यामुळे तुझे-माझे नाही तरआपलं ही अहंकारविरहीत भावना होती, ती प्रारंभीपासून शेवटपर्यंत जपली. भगवानगड आणि गहिनीनाथ गडाची उभारणी दोघांनी विचाराने केली. एवढेच नव्हे तर समस्त भक्तांसाठी भाऊंनी बाबांच्या पुण्यतिथीनंतर आठ दिवसांच्या फरकाने देह ठेवला. केवढा आदरभाव. या सप्ताहात दोघांच्याही पुण्यतिथी साजऱ्या होत आहेत. सद्या अध्यात्माच्या क्षेत्रासह सगळीकडे जे हेवे-दावे सुरू आहेत ते पाहून सच्च्या भक्तगणांना या महात्म्यांच्या परस्परांवरील आदरभावाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा समाजाच्या भल्यासाठी भाऊ-बाबांच्या विचांराचे सर्वांनीच अनुकरण करण्याची नितांत गरज आहे. भाऊ-बाबांचे कार्य आजही तेवढंच प्रेरणादायी आहे आणि यापुढेही राहील. त्यांना त्रिवार वंदन.

वामनभाऊंचे जीवन निष्कलंक, अत्यंत कोटेकोर व शिस्तबध्द होते. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, गुजरात, आंधप्रदेश, हरियाणा आदी राज्यांमध्ये हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून संत महिमा व भागवत धर्माचा प्रसार केला. गावोगावी होणाऱ्या पशुहत्या बंद केल्या. अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढले. शिक्षणाचे महत्त्व किर्तनाच्या माध्यमातून पटवून दिले. भरकटलेल्यांना भक्मिमार्गाला लावले. हरीनाम सप्ताहांद्वारे अन्नदान, परोपकार, परस्परांतील आदरभाव वाढीस लावला. त्यांच्यावर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचा पभाव होता. तर आचारणात नाथांचे वैराग्य आणि वाणीत सिध्दता होती. पंढरपूरची वारी नियमित करून भक्तीमार्गाचा महिमा अखंड समाजाला पटवून दिला. किंबहूना माणसाला माणूस म्हणून घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने त्यांनी केले. समाजाच्या सर्वागिण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. समाजजीवनाला कलाटणी दिली. म्हणून अलीकडच्या काळातील ते एक क्रांतिकारी समाजसुधारक ठरले. कृष्ण पक्षातील वद्य अष्टमी म्हणजेच २४ जानेवारी १९७६ साली भाऊंनी देह ठेवला. मात्र त्यांचे हे कार्य संपूर्ण मानवजातीला आजही दीपस्तंभाप्रमाणे सन्मार्ग दाखवत आहे. त्यांचा शिष्यगण, त्यांनी घडविलेले अनेक किर्तनकार, टाळकरी, वारकरी गहिनीनाथ गड येथे या महात्म्याच्या पुण्यतिथीला न चुकता हजेरी लावतात. पुण्यतिथीला राज्यभरातून लाखोंच्या संख्यने भाविक भाऊंच्या समाधी दर्शनासाठी गहिनीनाथ गडावर येतात आणि त्यांच्या विचाराचं सोनं आपल्या घरी घेऊन जातात. भाऊंना विनम्र अभिवादन...

लेखक
पोपट सांगळे
मा.उपाध्यक्ष, अ.नगर प्रेस क्लब.
मो. ९४ २२२२५००१

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने